MY BEST ARTICLES

जिद्दीला सलाम......🙏
मुलगी शिकली अन् प्रगती  झाली... 
या उक्तीप्रमाणे सावित्रीबाईच्या लेकी 
सावित्रीबाईंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून 
          कुमारी अनामिका दत्ताराम पालव सारखी कोकणातील खेड्यातील एक मुलगी शिक्षणासाठी झटत आहे. तिचे वडील भाड्याची रिक्षा चालवतात,  स्वतःच्या मालकीचा शेतीचा तुकडाही नाही, अशी बिकट घरातील आर्थिक परिस्थिती  असली तरी त्यातून तिने खंबीरपणे मार्ग काढून इयत्ता दहावी मध्ये बोर्ड परीक्षेत ९६% टक्के गुण मिळवून उत्तुंग यश संपादन केले. त्याबद्दल तिचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे.
        अनामिका चे वडील श्री. दत्ताराम पालव यांचे विशेष कौतुक करावेसे वाटते मुलीच्या शिक्षणासाठी त्यांनी काहीही कमी पडू दिले नाही. पोटाला चिमटा काढून इयत्ता दहावी पर्यंत तिच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. परंतु आता त्या तिचं कॉलेज व पुढील उच्च शिक्षण कसे होईल याची काळजी त्यांना लागून राहिली आहे. 
        संत रोहिदास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री.अशोक वेताळ सर यांनी अनामिकाला पुढील शिक्षणासाठी संस्थेतर्फे आर्थिक मदत मिळवून दिली आहे. तसेच संस्थेच्या सभासदांनी कुमारी अनामिका हिला शैक्षणिक साहित्याची मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.    
         श्री.राजेश जाहीर सावंत यांच्या प्रज्योती पुस्तक पेढी जोगेश्वरी मुंबई तर्फे तिला सीईटीचे सर्व पुस्तके व गाईड त्वरित उपलब्ध करून दिले. तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न आहे. अशाप्रकारे समाजाच्या सहभागाने नक्कीच तिचे स्वप्न पूर्णत्वास जाईल.
      अनामिका प्रमाणेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका दुर्गम भागात राहणारी स्वप्नाली या सावित्रीच्या लेकीने गावात इंटरनेट रेंज मिळत नाही म्हणून गावाजवळच्या डोंगरावर झोपडी बांधून या कन्येने ऑनलाईन अभ्यास सुरू ठेवला. अशा या कोकणच्या लेकींची जिद्द चिकाटी व मेहनत पाहून नक्कीच त्यांचा अभिमान वाटतो.
          विशेष म्हणजे या लेकीची व तीच्या कुटुंबाची माहिती आमच्या शाळेतील माझे सहकारी व कष्टाळू शिक्षक 
श्री. प्रकाश परब यांच्याकडून मला मिळाली. त्याबद्दल परब सरांचे विशेष आभार. त्याच्यामुळे कुमारी अनामिका पालव व तिची प्रेरक कथा तुमच्यासमोर शब्दबद्ध करण्याची  संधी मला मिळाली.
       मित्र हो, अशा या अनामिका सारख्याच्या प्रेरणादायी कामगिरीतून आपणास ही प्रेरणा मिळो यासाठी हा माझा लेख-प्रपंच.
🙏 धन्यवाद!!🙏
लेखक :-
श्री. अशोक वेताळ
माजी मुख्याध्यापक, समुपदेशक 📝लेखक व 🎨चित्रकार.
































माझे बोट धरून इंग्रजी शिकवणारे व पाठीवर शाबासकीचे थाप देणारे थोर व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले.
                 इयत्ता पाचवीत कराची हायस्कूल मध्ये मी प्रवेश घेतला.त्यावेळी इयत्ता पाचवीचे वर्ग शिक्षक होते श्री. रविकांत अणावकर सर, तरुण तडफदार, उत्त्सही,चैतन्य मूर्ती व्यक्तिमत्व. शाळेतील सर्व शिक्षक आणि विद्यार्थी त्यांना प्रेमानं रवी सर अशी हाक मारत असत.
                माझा शाळेचा पहिला दिवस मी खेड्यातून आलेला, पहिली ते चौथी खेड्यामध्ये शिकलेला, माझी गावंढळ भाषा ऐकून वर्गातील मुले मला चिडवू लागली, तेव्हा रवी सरांनी सर्व विद्यार्थ्यांना दम दिला व त्यांना समजावुन सांगितले. रवी सर इंग्रजी सुंदर शिकवायचे, वर्गात इंग्रजी शिकवत असताना मी इंग्रजी विषयात कमजोर असल्याचे  रवी सरांनी  ओळखले होते. एक दिवस त्यांनी मला जवळ बोलावले व सांगितले 
"उद्या रविवार आहे. उद्या तू वही व पेन घेऊन माझ्या आजोबांच्या ऑफिसमध्ये यायचय.."
मी गोंधळून विचारले,
"कुठं सर.. "
सर म्हणाले, 
"खाली तळमजल्यावर मुख्याध्यापक, प्रधान सरांच्या शेजारी आजोबांचं ऑफिस आहे, तिथे तू सकाळी ये"
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच शाळेत पोहोचलो. रविवार असल्याने गेट बंद होत, गेट थोडस  ढकळून अंग चोरून आत शिरलो. रवी सरांच्या आजोबांचं समोरच ऑफिस होते. ऑफिसच्या दरवाजासमोर मी थोडासा घुटमळलो. समोर टेबलाच्या पलीकडे लाकडी खुर्चीवर आजोबा बसले होते.रवी सरांना काहीतरी सांगत होते व त्यांच्यासमोर छोट्याश्या सोफ्यावर रवी सर बसले होते व आजोबा जे सांगतील ते रवी सर लिहत होते. त्यांचे लक्ष जावे म्हणून दरवाजातूनच, मी विचारले,
" माय कमिंग सर"
सरांनी माझ्याकडे हसून पाहिले व आजोबा मात्र प्रश्नार्थक नजरेने माझ्या कडे पहात होते. रवी सर म्हणाले,
"अरे वेताळ ये .. बैस येथे"
त्यांनी मला त्यांच्या शेजारी सोफ्यावर बसविले व म्हणाले बाळ तू ऑफिस मध्ये येताना आमची परवानगी घेतलीस छान वाटलं पण इंग्रजी वाक्य चुकीचा बोललास. तू आमची परवानगी घेताना
 "मे आय कम इन सर" 
असे विचारायला हवे होते. 
मी म्हणालो "हा सर" 
"यापुढे मी असेच विचारेल सर,"
सरांनी माझ्या वाहीवराती सुंदर अक्षरात A to Z मुळाक्षरे लिहून दिली व म्हणाले, 
"ही मुळाक्षरे दहा वेळा लिहून काढ"
सर पुन्हा आपल्या कामाला लागले. मुळाक्षरे लीहता लीहाता, मी सरांकडे पाहत होतो. आजोबा जे सांगत होते ते सर झरझर लिहून काढत होते, त्यांचा मोत्यासारखे अक्षर पाहून मला ही त्यावेळी त्यांचा  हेवा वाटला. मी त्यांच्यासारखा सुंदर अक्षर काढण्याचा प्रयत्न करत होतो पण ते मला जमत नव्हते, कसेतरी कोंबडीच्या पायासारखे अक्षर काढून मी दहा पाने मुळाक्षरे पूर्ण केली व सरांना दाखवले, सरांनी त्यांच्याकडे असलेल्या फुलस्केप पैकी एक फुलस्केप मला दिला व म्हणाले,
 "वही बंद कर व या पनावर  न पाहता एकदा ए टू झेड मुळाक्षरे पटकन लिह"
ए टू झेड मुळाक्षरे न पाहता  लिहून सरांना दाखवले. तसे सरांनी माझ्या पाठीवर थाप देऊन शब्बासकी दिली व म्हणाले, 
"वा वेताळ, वा तू  तर हुशार झालास"
ती शाबासकीची थाप अजून ही मला आठवते आहे. असे कितीतरी प्रसंग आहेत. आज मनामध्ये उचंबळून आले आहेत. उत्तम काम केलं की प्रेमानें पाठीवर थाप देणारे, चुकलं तर वेळेत कानउघडणी करणारे तसेच समजावुन सांगणारे योग्य मार्गदर्शन करणारे आमचे अबा! देवाघरी गेले ही गोष्ट माझ्या मनाला प्रचंड वेदना देणारी आहे. सर्वांचे आवडते रवी सर म्हणजे आमचे आबा!! त्यांच्या या आत्म्यास सद्गती चिरशांती लाभो हीच माझी ईश्वरचरणी नम्र प्रार्थना!!

आबा!!!!आपला
अशोक वेताळ
लेखक व मुख्याध्यापक


माझे प्रवास वर्णन

अन्नदाती भिकारीण...


    माझ्या भटकंतीच्या दरम्यान घडलेल्या हा प्रसंग मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. चार वर्षांपूर्वी मे महिन्याच्या सुट्टीत मी माझे कुटुंब व माझ्या मित्राचे कुटुंब असे आम्ही देवदर्शन व भ्रमंतीसाठी दोन गाड्या करून बाहेर पडलो. चार दिवस गड किल्ले फिरून व देवदर्शन करून आम्ही परतीच्या वाटेला निघालो.गावी घरी जाण्याची ओढ लागली होती.

    या सर्व प्रवासात गुगल मॅप आम्हाला खूप मदतीचा ठरला होता. नवनवीन पर्यटन स्थळे शोधून तिथपर्यंत पोचवण्याचे काम गुगल मॅप करीत होता. त्यामुळे या सर्व प्रवासात आम्हाला कोणालाही पत्ता न विचारता पर्यटन स्थळे शोधता येत होती. त्यामुळे आम्ही खुश होतो. गुगल मॅप ला मनापासून धन्यवाद देत होतो.

    पण आयत्यावेळी या गुगल मॅप आम्हाला दगा दिला होता. परतीच्या प्रवासात आम्ही आमच्या गावचा पत्ता गुगल मॅप टाकला आणि आमच्या दोन्ही गाड्यांचे ड्रायव्हरला सांगितले याप्रमाणे आपल्याला पोहोचायचे आहे. ड्रायव्हरही निश्चिंत होते. आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. काही अंतर गेल्यावर एका वळणावर गुगल मॅप मध्ये आम्हाला शॉर्टकट छोटा रस्ता दाखवत होता. या शॉर्टकटने गेलो असता आमचे प्रवासाचे दोन तास वाचणार होते. हायवेने गेले असता दोन तासाचा प्रवास वाढणार होता. त्यामुळे आम्ही त्या शॉर्टकटने जाण्याचे ठरवले व दोन्ही गाड्या त्या रस्त्याला लागल्या. काही अंतर गेल्यावर हे छोटासा घाट लागला.घाटात असताना आमचे मोबाईल नेटवर्क गेले. घाट संपल्यावर पुन्हा मोबाईल नेटवर्क येईल असे आम्हाला वाटले. घाट संपल्यानंतर पुढे जंगल सुरू झाले. कोणाचेच नेटवर्क काही येईना त्यामुळे गुगल मॅप बंद .

    आता झाली पंचायत? आता पुढे कसे जायचे असा प्रश्न आमच्या समोर पडला. काही अंतर गेल्यावर पुढे दोन रस्ते दिसले. आता कुठल्या रस्त्याने जावे.जंगलामध्ये चिटपाखरूही नव्हते. फारशी वर्दळ नव्हती. आमच्या मागेपुढे गाडी नव्हती. बराच वेळ कोणीतरी येईल म्हणून वाट पाहिली परंतु नंतर जंगलामध्ये एवढा वेळ थांबणे धोक्याचे आहे अशा मला वाटलं , मी अंदाजे ड्रायव्हरला उजवीकडील रस्त्याने गाड्या घेण्यास सांगितले. जंगलामध्ये कुठेच लोकवस्ती नव्हती. दोन अडीच तास प्रवास केल्यावर आम्हाला एक छोटेसे गाव दिसले. सर्वांना हायसे वाटले. पुढे गेल्यावर रस्त्याच्या कडेला एक शेतकरी शेतात काम करताना दिसला. गाडी थांबून आम्ही त्याला शिरूरला जायला हा रस्ता बरोबर आहे का? असे विचारले. तेव्हा तो प्रश्नार्थक नजरेने आमच्याकडे पाहू लागला.

साहेब तुम्ही रस्ता चुकलात..

    जंगलामध्ये जिथून तुम्ही डाव्या बाजूला वळलात त्याऐवजी तुम्हाला उजव्या रस्त्याने जायला हवे होते. आता तुम्हाला परत मागे फिरावे लागेल. गुगल मॅप वर आम्ही विसंबून राहिलो आणि पूर्ण फसलो होतो. आता परत फिरण्या शिवाय काही पर्याय नव्हता. सकाळपासून काहीच न खाल्ल्यामुळे सर्वांच्याच पोटात कावळे ओरडू लागले होते. तेव्हा या गावात काही हॉटेल किंवा जेवणाची सोय होईल का? असे त्या शेतकऱ्याला विचारलं. तो म्हणाला साहेब  छोटेसे गाव आहे इथे हॉटेल वैगरे तुम्हाला मिळणार नाही पण घरगुती जेवणाची कुठे सोय होत असेल तर पहा.

    आम्ही पुढे निघालो. गाव छोटेसे होते रस्त्याच्या कडेला दोन चार छोटी छोटी दुकाने दिसत होती पण हॉटेल काही दिसेना. गाव संपत आले तेव्हा एका झाडाखाली एक वयस्कर आजी बसलेली आम्हाला दिसली. गाडी थांबून तिच्याकडे चौकशी केली.गावात काही घरगुती जेवण मिळेल का?

अज्जीन थोडा विचार केला व म्हणाली, मिळेल ना.. 

या माझ्या बरोबर.. 

    आम्ही झाडाच्या सावलीत गाड्या लावल्या व चालत सर्वजण तिच्या झोपडीकडे निघालो. आजीने  एक दहा मिनिटात गरम गरम भाकऱ्या आणि  गरम पिठले आमच्यासमोर आणून ठेवले. सर्वांना प्रचंड भुका लागल्या होत्या. त्यामुळे अक्षरशः त्या गरम जेवणावर अम्ही सर्वजण तुटून पडलो. चुलीवरच्या गरम भाकऱ्या आणि पिठलं खाताना     गावच्या आजीची आठवण आली. जेवण झाल्यावर सर्वांनी  तृप्त मनाने आजीला धन्यवाद दिले व हिशोबाने  जेवढे पैसे होतील त्यापेक्षा शंभर रुपये जास्त मी आजीला दिले. वरचे पैसे घेत नव्हती तरीही आम्ही जबरदस्तीने दिल्यानंतर तीने ते घेतले. तीचा निरोप घेऊन आम्ही सर्वजण गाडीकडे आलो. सर्वजण गाडीत बसले, माझ्या इतर कुणाच्या मोबाईलला रेंज नसल्याने घरी निरोप कसा द्यावा याची चिंता मला लागली होती. एव्हाना आम्ही घरी पोहोचायला हवे होते पण रस्ता चुकल्याने आम्ही भरकटलो होतो. 

रस्त्याच्या पलीकडे टपरीवर सार्वजनिक फोन दिसत होता.

    त्या फोनवरून तरी घरी निरोप द्यावा या उद्देशाने मी रस्ता क्रॉस करून त्या टपरी कडे पोहोचलो. एक रुपयाचा कॉईन टाकून घरी निरोप दिला की आम्ही रस्ता चुकल्याने आम्हाला उशीर होईल. थोडक्यात माहिती सांगून मी फोन ठेवला त्याबरोबर तो दुकानाचा मालक मला म्हणाला..

साहेब तुम्ही सर्वजण त्या म्हातारीकडे जेवलात वाटतंय ?

मी म्हणालो हो रे बाबा.. इथे कुठे हॉटेल दिसेना म्हणून तिच्याकडे जेवण घेतले.. 

आज्जीचे जेवण छान होतं..

तो म्हणाला...

साहेब तुम्ही फार मोठी चुकी केलीत..

मला कळेना यात काय मोठी चूक आहे?

मी त्या दुकानदाराला विचारले.. 

तसा तो म्हणाला....

भाऊसाहेब अहो ह्या म्हातारीला कोणीही नाही. 

गावात फिरून जोगवा मागते, पिठ व धान्य गोळा करते. त्याच्याच भाकरी व जेवण तुम्हाला तिने बनवून दिले आहेतसेच जेवण बनवताना जे पाणी वापरले आहे ते तिच्या घरा मागच्या नदीचे आहे. या नदीचे पाणी आजुबाजुच्या केमिकल कंपन्यांमुळे दूषित झाले आहे. त्यामुळे गावातले कोणीही ते पाणी पिण्यासाठी सुद्धा वापरत नाही. त्या भिकारणीने बनवलेले त्या नदीच्या दूषित पाण्याचे तुम्ही सर्व जेवण जेवला आहात. त्याचे बोलणे ऐकून मी थोडावेळ स्तब्ध झालो. पुढे बराच प्रवास करायचा आहे, प्रवासात आम्हाला काही त्रास होणार नाही ना, त्या आज्जीचे जेवण बाधणार तर नाही ना, अशी भीती मनाला चाटुन गेली.

    काही न बोलता मी गाडीत येऊन बसलो. गाडी सुरु झाली तेव्हा मी सर्वांना विचारले आजीचे जेवण कसे होते. मुलं व बायको म्हणाली खूप छान होते. यातच मला सर्व काही मिळाले होते. आम्ही उशिरारात्री घरी पोहोचलो. दुसऱ्या दिवशी आराम करून मुंबईकडे निघालो पण प्रवासात किंवा दुसऱ्या दिवशी आम्हा कोणालाही काही त्रास झाला नाही. ज्या वेळी हा प्रसंग मला आठवतो तेव्हा मला असे वाटते ती त्या आजीने आम्हाला प्रेमाने आणि मनापासून जेवू घातले होते, त्यामुळे आम्हाला कोणालाच काहीच त्रास झाला नाही.

अन्नदाती आजीने मनापासून प्रेमाने व आपुलकीने दिलेले जेवण आम्हाला कसे बाधणार होते. गुगल मॅप ने केलेली  फजिती व अन्नदाती आजीचे जेवण या दोन गोष्टी मी आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही...


 

लेखक -

श्री. अशोक वेताळ

मुख्याध्यापक- शिशुविकास मंदिर




!! ऑनलाइन स्वयं अध्ययन आजच्या काळाची गरज !! 
        स्वयंअध्ययन म्हणजे विद्यार्थी वर्गाबाहेर त्याच्या सोयीनुसार वेळेनुसार अभ्यासाचे स्वतः नियोजन व नियंत्रण करीत असतो. आजच्या या लॉकडाउन च्या काळात स्वयं अध्ययनाची नितांत आवश्यकता आहे असे माझे मत आहे.
स्वयम् अध्ययनाचे फायदे........
       विद्यार्थी आपणास आवडणाऱ्या विषयांवर घटकांवर लक्ष केंद्रित करून स्व अनुभवाच्या आधारे व विविध माध्यमातून मिडीया व्हाट्सअप इंटरनेट गुगल इत्यादी सर्व प्रकारच्या इलेक्ट्रिक माध्यमाद्वारे डिजिटल माध्यमातून निरनिराळे कौशल्य विद्यार्थी हस्तगत करून स्वयंमूल्यमापन करत असतो.
       विद्यार्थी यातून विविध घटकांवर सखोल विचार करून आपली स्मरण शक्ती व आकलन क्षमता वाढवू शकतो. स्वतःच्या वेळेनुसार मुक्तपणे विद्यार्थी शिकत असतो. त्याला वेळेचे बंधन नसते.
        विद्यार्थी अभ्यासासाठी इतरांवर अवलंबून न राहता स्वतः अनेक विषयाचा व त्याच्या आवडीच्या विषयाचा अभ्यास करत असतो.
         स्वयंअध्ययन पहिल्यांदा वेळखाऊ कटकटीचे त्रासदायक वाटते पण एकदा ते जमले कि विद्यार्थ्यांना स्वयम् अध्ययनाची सवय लागते व त्याचा फायदाच विद्यार्थ्यांना होतो.
         अशाप्रकारे स्वयंअध्ययन हे भविष्यकाळातील प्रभावी साधन आहे व भविष्यातील प्रभावी अध्ययन पद्धती म्हणून ऑनलाईन स्वयंअध्ययन पद्धतीचा पाठपुरावा करावाच लागेल आजची ही परिस्थिती पाहता विद्यार्थी व शिक्षकांना स्वयंअध्ययन पद्धती साठी तयार व्हावेच लागेल. 
धन्यवाद!!
   लेखक
श्री. अशोक वेताळ
मुख्याध्यापक - शिशुविकास मंदिर 

!! “ माझे गुरुवर्यमाझे श्रद्धास्थान ” !!

' गुरु  ' म्हणजे एक समुद्र ,ज्ञानाचा,......

पवित्र्याचाएक आदरणीय कोपराप्रत्येक व्यक्तीच्या मनातला......


     माझे आदर्शमाझे गुरुवर्यमाझे श्रद्धास्थान... आदरणीय श्री.रविकांत अणावकर गुरुजी (आबा)त्यांनी आपल्या वयाची ७५ वर्षे पूर्ण केली आहेत...म्हणजे हे त्यांचे सहत्रदर्शनचंद्र बघितल्याचे वय....पण मी काही अलंकारीक किंवा वाहवा मिळावी म्हणून हे लिहीत नाही...तर गुरु  विषयी एक कृतज्ञता शब्दबद्ध व्यक्त करण्याची हीच योग्य वेळ आहे असे वाटते...इतकेच...मी इयत्ता ५ वी मध्ये मह्नगर पालिका शाळेतून , कराची (आत्ताची भाटीया हायस्कूल) हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला . वयाच्या १० व्या वर्षा पासून सरांच्या संपर्कात मी आलो . सर त्यवेळी ५ वी ते १० वी वर्गाना इग्रंजी विषय शिकवायचे . 
श्री.रविकांत अणावकर सर कराची शाळेत  मला जवळजवळ सहा  वर्ष शिकवायला होते. अगदी मस्त शिकवायचे.. ते विद्यार्थीवर्गात प्रचंड लोकप्रिय शिक्षक होते. सर माझे जीवनाचे आणि शिक्षण क्षेत्रातले आदर्श गुरु होते आणि  आज ही आहेत....त्यांचे हासणे म्हणजे हापूस आंब्या सारख . त्यांना रागवताना किंवा विद्यार्थ्यांना मारताना आम्ही कधीच पहिले नव्हते. पण सरांची एक आदर युक्त भिती मात्र आम्हा विध्यार्थ्यांना असे .      
मे १९८५ मध्ये मी जे जे स्कूल आर्ट मधून ए.टी.डी. प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालो. रिझल्ट लागल्या बरोबर बायोडेटा व पेढे घेऊन संध्याकाळी सरांच्या घरी गेलो . सरांना खूप आनंद झाला , सरांनी बायोडेटा ठेवून घेतला व म्हणाले,
“ हे बघ आपली शाळा विना अनुदानित आहे, 
" पगार ही २०० रुपये,३०० रुपये आम्ही शिक्षकांना देतो , तोही वेळेवर मिळेल याची शासवतीनाही.
मी म्हणालो ,“सर मला तुमच्या मार्गदर्शनाखाली शिशुविकास मंदिर हायस्कूल मध्येच काम करायचे आहे “माझा ठाम निश्चय पाहून सरांनी मला समजावले,
“ हे बघ सध्या आपल्या शाळेत एक कला शिक्षिका कार्यरत आहे .
“ माझ्या शाळेत सध्या वेकेन्सी नाही आहे .”
“ तुझे क्वालीफिकेशन आहे ", 
" तु अनुदानित शळेत प्रयत्न कर ", 
" नोकरी तुला नक्कीच मिळेल ",
मी  थोडासा नाराज झालो व सरांचा आशीर्वाद घेऊन बाहेर पडलो .  जून १९८५ मध्ये भांडूप, येथील अनुदानित शाळेत मला नोकरी मिळाली . पण मन त्या शाळेत रमत नव्हते.. १९८९ च्या मे महिन्यत मला सरांचा निरोप आला, की आपल्या शाळेतील कला शिक्षिकेला अनुदानित शाळेत नोकरी मिळाल्याने, त्या शाळा सोडून गेल्या आहेत . जून पासून एक कला शिक्षकाची गरज आहे . दुसऱ्या दिवशी सकाळी सरांच्या ऑफिसमध्ये मी पोहचलो . सरांनी माझी चौकशी केली व म्हणाले
“ तुझ्या परिचयाचा कला शिक्षक आहे का ? ”
मी म्हटले,
" हो अहे ना..!!!
“ मी स्वतः "
" अर्ज घेऊन आलोय आहे ”
" मी भांडूपची शाळा सोडून आपल्या शाळेत काम करायला तयार आहे." 
सर म्हणाले 
“तु अनुदानित शाळा सोडून , विनाअनुदानित शाळेत येतोय ,पुन्हा एकदा विचार कर. 
“ पण मी ठामपणे सागितले ,“ मला आपल्याच शाळेत काम करायचे आहे.”
माझा दृढ निश्चय पाहून सर म्हणाले,
“ सोमवारी १३ जुन रोजी शाळेत रुजू व्हा.”
मला अतिशय आनंद झालl   व मी कामाला सुरुवात केली. ज्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली मी विदयार्थी अवस्थेत शिकलो , त्या  गुरूंच्या  मार्गदर्शनाखाली विध्यार्थ्यांना शिकवण्याचा परमोकच्च  आनंद मला मिळत होता. काही कालावधी नंतर माझ्या शिक्षक पदाची मान्यता घेण्यासाठी शिक्षण विभाग कार्यालयाने माझ्या पुर्वीच्या शाळेतील डीसचार्ज सर्टिफिकेट व त्या शाळेतील सर्विस बुक याची मागणी केली . ते घेण्यासाठी मी भांडुपच्या शाळेत गेलो असता त्या शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी डीसचार्ज सर्टिफिकेट व त्या शाळेतील सर्विस बुक देण्यास नकार दिला, तेव्हा सरांनी पुढाकार घेऊन त्या वेळचे शिक्षण निरीक्षक मा. श्री. वाघोदे साहेब यांचे प्रयत्नाने माझा प्रश्न सोडवला .. अशा छोट्या छोट्या खुप गोष्टी आहेत की जेणे करुन समोरच्याला अजुन आनंद कसा देता येइल याचा सर सतत  विचार करत असत आणि आज ही करतात, ते हे विशेष....
आजही या वयात त्यांच्याकडे सृजनात्मक उर्जा आहे. ते सतत म्हणतात " ही सृजनात्मक उर्जा मला माझ्या आजोबा कडून मिळाली आहे व ती माझ्या समाजातील प्रत्येक घटकाला पोहचविण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो.".. अजुन किती आणि काय काय वर्णन करु अणावकर सरांविषयीआता फ़क्त इतकेच सांगते त्यांना कि सर... तुम्हाला खुप चांगले आरोग्य लाभो..सुखी समाधानी उर्वरीत जीवन जावो... आणि तुम्ही अजुन खुप खुप आयुष्यमान होवो.... तुमची १०० री साजरी करायची माझी शुभमंगल कामना पूर्ण होवो.. तुमचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन सतत आम्हाला मिळो..... हीच शुभकामना!!!!! 
खरोखरच मी भग्यवान आहे... माझे भाग्ये ... सरांचा विदयार्थी म्हणून सरांच्या संपर्कात आलो ... सरांच्याच शाळेत शिक्षक झालो ..... सरांच्या मार्गदर्शना खाली ३४ वर्ष माध्यमिक विभागात सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत होतो... व ... मे २०१७ पासून माध्यमिक विभागात मुख्याध्यापक म्हणून मी कार्यभार स्वीकारला आहे.....

सागराचे वर्णन जसे अमर्यादीत तत्सम हे...तरी ही मला जसे

जमेल तसे, मला भावलेले माझे प्रेमस्वरुप अणावकर सर

(आबा) इथे शब्दबद्ध करायचा छोटासा प्रयत्न केला आहे...
  • धन्यवाद !!!!!

 लेखक,

श्री. अशोक रा. वेताळ
मुख्याध्यापक -  शिशुविकास मंदिर हायस्कूल माधामिक विभाग )





..... 🎨 *चित्रकला शिक्षक* 🎨....

                चित्रकला शिक्षक हा  किमयागार असतो. अध्यापनाच्या तासांना श्रवणभक्ती आणि डोकीफोड करुन कंटाळलेल्या मुलांना, चित्रकलेचा तास सुगंधी वा-याची शीतल झुळूक वाटते. वर्गातला ब्लैक एंड व्हाईट माहौल सरुन चित्रकलेच्या तासाला वर्गात सप्तरंगी इंद्रधनुष्य प्रकटते. मुलं त्या रंगात न्हाऊन निघतात. उपवनातील रंगीबेरंगी फुलांसारखी ती सुंदर दिसतात. 
             फलकलेखन सर्वच विषयाचे शिक्षक करीत असतात. परंतु चित्रकलेच्या शिक्षकांचं फलकलेखन, मुलांना अतिशय प्रिय असते. कारण एरवी मूक असलेला काळा कुरुप फळा, चित्रकलेच्या तासाला मुलांशी चक्क बोलू लागतो. आणि सुंदरही दिसतो. त्याला दृष्ट लागावी इतकी मुलं त्याकडे टक लावून पाहत असतात.
             अन्य विषयाच्या शिक्षकांना वर्गनियंत्रणाची जशी समस्या भेडसावते. तशी ती चित्रकलेच्या शिक्षकांना भेडसावत नाही. छडीविना शिक्षण हे चित्रकलेच्या तासालाच पहावयास मिळते, विद्यार्थीप्रिय शिक्षक हे विशेषण चित्रकला शिक्षकालाच लागू पडते जो कमीतकमी शब्दांचा वापर करतो तो उत्तम चित्रकला शिक्षक असतो. कारण एक चित्र हे हजार शब्दांचे काम करीत असते. चित्रकला शिक्षकाच्या जिभेचं काम त्याची बोटं करीत असतात. 
             परीक्षेचं पर्यवेक्षण हे आम्हा शिक्षकांच्यादृष्टीने कंटाळवाणं काम. पण तेच चित्रकलेच्या पेपरचं पर्यवेक्षण मात्र सुंदर पर्वणी असते. चित्र काढण्यात रममाण मुलं पाहून मन प्रसन्न होतं. इतर विषयाच्या पेपराच्यावेळी रूक्ष वाटणा-या त्यांच्या चेह-यांवर ओसंडणारा सृजनाचा आनंद पहातच रहावासा वाटतो. 
             मुलं जी गोष्ट शब्दात व्यक्त करु शकत नाहीत ती ते चित्रात व्यक्त करतात. चित्र जणू जाणीवेची चित्रलिपीच असते. चित्रं म्हणजे मुलांच्या जाणीवेचं प्रवेशद्वार असते. चित्रकलेच्या पेपराच्यावेळी उघडणारं हे द्वार अन्य विषयांच्या वेळी मात्र बंद असते.
             चित्रांप्रमाणेच निबंधातही मुलांच्या नेणीवेचे प्रतिबिंब पडत असते. पण त्यासाठी निबंधाचे विषय त्यांच्या आवडीचे असावे लागतात. पण तसं घडत नाही व मुलं निबंधही पाठ करुन लिहीतात. पाठांतरही शेवटी कॉपीच असते. चित्रकलेच्या पेपरात मात्र कॉपी करता येत नसते. कॉपीमुक्त परीक्षा म्हणजे चित्रकला विषयाची परीक्षा. 
             ज्ञान, कला आणि धान्य सांडण्यातचं त्यांची सार्थकता असते. म्हणून कला शिक्षकाने सांडेस्तोवर कलेचं ज्ञान मुलांना दिलं पाहिजे. त्यासाठी चित्रकलेवर चित्रकला शिक्षकाचं नि:सीम प्रेम असावे लागते. अर्जूनाला जसा पोपटाचा फक्त डोळाच दिसत होता. तसं चित्रकला शिक्षकाला फक्त चित्रंच दिसली पाहिजेत. अन्य गोष्टींकडे त्याचा कल असणे ही गोष्ट कलेशी प्रतारणा ठरते. इतर विषयाचं ज्ञान देण्यासाठी इतर विषयाचे शिक्षक आहेत. ते कलेचं ज्ञान नाही देऊ शकत. म्हणून चित्रकला शिक्षकाने कलेशिवाय मुलांना इतर काही देवूच नये. 'गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे' अशी खंतावण्याची वेळ त्याच्यावर येऊ नये.
             कलावंत हे स्वर्गाच्या अखेरच्या पायरीवर पोहचलेले पथिक असतात. त्यांच्यात नि स्वर्गात फक्त एका पावलाचे अंतर बाकी असते. म्हणूनच त्यांना गहन विषयांचंही सहज आकलन होते. अशा कलावंतांना 'कलायोगी' म्हणतात. असे कलायोगी शिक्षक मुलांना नंदनवनाची सफर घडवू शकतात. नंदनवनाची सफर घडविणारे कलाशिक्षक लाभणे, हे सद़्भाग्य असते. ते सद़्भाग्य मला लाभले. आमचे कलाशिक्षक म्हणायचे चित्रकला ही विश्वभाषा आहे. ज्याला ती अवगत आहे त्याला अन्य भाषा शिकण्याची गरज उरत नाही. निष्णात चित्रकला शिक्षक मुलांच्या हातांना चांगले वळण लावत असतो. मुलांचे हात जर कलेकडे वळले, तर ते गुन्हेगारीकडे वळत नाहीत. मुलांच्या कलागुणांना वाव मिळाला तर काळ्या-पांढ-याचा संघर्ष संपुष्टात येतो. मुलं स्वावलंबी बनतात. नोकरीच्या मागे धावण्याऐवजी कलेवर उपजीविका करु लागतात. कलांचा विकास होऊन समाजाचं कलवैभव वाढीस लागते. उत्तमोत्तम कलाकृतींचे सृजन घडून समाजाचे ऐश्वर्य वाढते.

🎨 एक कला शिक्षक..🙏🏻

संग्राहक........





7 comments:

  1. फारच उत्तम लिखाण वेताळ सर.. प्रवास वर्णन अतिशय भावपूर्ण झाले आहे. असेच लिहित रहा, पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!! आपला एक वाचक

    ReplyDelete
  2. खूप सुंदर विचार मांडले आहेत श्री. अशोक सर. श्री. अणावकर सरांविषयीचे आपले विचार मनाला खूपच भावले कारण ते व्यक्तिमत्त्वच तसे आहे.प्रेरणादाई.......... वाचक श्री. भोसले सर कुर्ला

    ReplyDelete
  3. वेताळ सर, सर्व कौतुकास्पद कामगिरीबद्दल अभिनंदन.अशीच प्रगती करीत रहा.BE BLESSED. श्री. हादगे सर मुंबई

    ReplyDelete
  4. सर्व कौतुकास्पद कामगिरीबद्दल आपला अभिमान वाटतो आहे.

    ReplyDelete
  5. आदरणीय वेताळ सर ,
    आपला आजीचे जेवण हा
    अनुभव फार फार आवडला ..
    लिखाणासाठी हार्दिक शुभेच्छा
    ,,,,,,आपला,,,, श्री.ससाणे सर.. नवी मुंबई.

    ReplyDelete
  6. अशोक सर आयुष्यतील हा चांगला अनुभव लिखाणातून शेअर केला आहे, वाचून खूप छान वाटलं. 👌💐 श्री. सतीश खोत, ठाणे

    ReplyDelete
  7. आपल्या सर्वांच्या स्फूर्तिदायक प्रतिक्रियांसाठी मनपूर्वक आभार मानतो....
    अश्याच शुभेछा व शुभ आशीर्वाद सोबत असावेत हीच प्रेमळ सदिछा !!!!
    पुनश्च आपले सर्व वचणप्रिय मान्येवारांचे आभार !!!!!!!!!!!!!!!!!!!

    ReplyDelete

CREATIVE E BOOK.COM

POPULAR POSTS